प्रतिनिधी जिजाबाई थिटे
शालेय शिक्षणासाठी,अभ्यासासाठी केवळ उपयुक्ततावादी केलेले वाचन किंवा घेतलेले शिक्षण फक्त एवढेच महत्त्वाचे नसून मानसिक स्वास्थ्यासाठी आणि वैचारिक जडणघडणीसाठी वाचन करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बहुचर्चित भुरा या पुस्तकाचे लेखक व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील प्रा.डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. ते पुस्तकमैत्री बुक गॅलरी आणि स्वास्थ्यमंत्र व्याख्यानमाला यांनी आयोजित केलेल्या प्रकट मुलाखतीत बोलत होते.संवादक डॉ. हनुमंत भवारी व डॉ. शीतल खिसमतराव आणि भुरा या पुस्तकाविषयी आणि आजूबाजूच्या वास्तव परिस्थिती संदर्भात प्रश्न विचारून मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन स्वास्थ्यमंत्र परिवारातील डॉ. नीलम गायकवाड, डॉ. कुंतल जाधव प्रतिक खिसमतराव व पुस्तकमैत्री बुक गॅलरीच्या संचालिका मयुरी भवारी यांनी केले होते. डॉ. शरद बाविस्कर यांच्या वैचारिक मंथनात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. शिक्षण म्हणजे काय? वाचन चळवळ का महत्त्वाची आहे? विद्यार्थ्यांनी आपला जीपीएस स्वतः तयार करावा, पालकांनी आपल्या अपेक्षांचे ओझं विद्यार्थ्यांवरती न लादता त्यांना स्वतंत्र विचार करण्याची संधी द्यावी, शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाचा आणि शिक्षण संस्थांचा दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे, लेखकांना भूमिका घेऊन लिहिणं आणि भूमिका घेऊन जगणं, मांजराला मांजरच म्हणण्याची क्षमता ठेवणं अशा अनेक विषयांसंदर्भात डॉ. बाविस्कर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच राजगुरुनगर सारख्या छोट्या शहरामध्ये वाचन चळवळीच्या कार्यक्रमाला एवढा उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल श्रोत्यांचे कौतुक केले. राजगुरुनगर मधील आणि परिसरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नीलम गायकवाड यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रतिक खिसमतराव यांनी करून दिला. सत्कार डॉ.कुंतल जाधव यांनी केला व मयुरी भवारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.