शिरूर :सुनिल जिते
शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील धामारी, कान्हुर मेसाई, पाबळ, केंदुर, चिंचोली मोराची इ गावे कोरडवाहु क्षेत्रात येत असल्याने शेतीसाठी सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात पडणाऱ्या पावसावरच वर्षभर अवलंबून राहावे लागते,त्यामुळे सिंचनाअभावी वर्षभर पीके घेण्यावर मर्यादा येतात. अशा कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी कृषि विभागाची योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अंतर्गत वैयक्तिक शेततळे संजिवनी ठरत आहे.
पावसाच्या अनिश्चित येणाऱ्या खंडामुळे सिंचनाअभावी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. पावसाळ्यात पावसाचे पाणी साठवणुक करुन उन्हाळ्यासह टंचाईच्या कालावधीत पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सोय करण्याच्या दृष्टीने शेततळ्याची सुविधा गरजेचे ठरते.जलसंधारणाच्या उपाय योजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली आहे. शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करुन वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे या योजनेमध्ये शेततळ्याच्या आकार व प्रकारानुसार १८,६२१ रु ते ७५ हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते.आॅनलाइन अर्ज केल्यानंतर वैयक्तिक शेततळे साठी सोडत पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जाते. अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हे क्षेत्र असावे ,क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही.
या योजनेची प्रचार व प्रसिद्धी करताना धामारी सजेचे कृषि सहाय्यक श्री संतोष सुतार यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी वर वैयक्तिक शेततळे साठी ऑनलाइन अर्ज करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.